सय्यदनगर रेल्वे गेटजवळ मनपाच्या निकृष्ट कामाचा बोजवारा

सय्यदनगर रेल्वे गेटजवळ मनपाच्या निकृष्ट कामाचा बोजवारा

पावसाळी वाहिनीचे काम पूर्ण होताच रस्ता मातीने बुजवला; मुसळधार पावसात माती वाहून गेल्याने खड्ड्यांचे साम्राज्य, संतप्त नागरिकांचा फ्लेक्सद्वारे निषेध

हडपसर-महम्मदवाडी रस्त्यावरील सय्यदनगर, रेल्वे गेट क्रमांक ७ येथे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेने पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न करता केवळ माती टाकून काम उरकल्याने पहिल्याच मुसळधार पावसात माती वाहून गेली आणि संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. या प्रकाराविरोधात संतप्त नागरिकांनी फ्लेक्स लावून प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मुख्य बातमी

गेल्या महिनाभरापासून सय्यदनगर रेल्वे गेट क्रमांक ७ येथे पावसाळी वाहिनीचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे डांबरीकरण करून तो पूर्ववत करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी केवळ माती टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर टाकलेली माती पूर्णपणे वाहून गेली. त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

या मार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वारांना शारीरिक दुखापतींचा धोका निर्माण झाला असून चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहने संथगतीने चालत असल्याने रेल्वे गेट परिसरात दिवसभर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या प्रकाराच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी “आम्हीच आमचा बाजार उद्ध्वस्त केला… #बेफिकीर प्रशासन #बिनजबाबदार लोकप्रतिनिधी” असा मजकूर असलेले फ्लेक्स लावून पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

पालिकेची जबाबदारी

विकासकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ता मूळ स्थितीत आणणे, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र या प्रकरणात ठेकेदाराच्या कामावर कोणतेही प्रभावी नियंत्रण दिसून आले नाही. परिणामी करदात्यांच्या पैशातून करण्यात आलेले काम पहिल्याच पावसात उखडल्याने पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामाची गुणवत्ता तपासणाऱ्या अभियंत्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का, निकृष्ट कामाला मंजुरी कशी मिळाली आणि सार्वजनिक पैशांचा झालेला अपव्यय कोण भरून काढणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांची मागणी

स्थानिक नागरिक अर्जुन सातव, नाझीम शेख आणि शरफत पानसरे यांनी संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेच्या काळ्या यादीत (Blacklist) टाकावे, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कामावर देखरेख करणाऱ्या संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, सय्यदनगर रेल्वे गेट क्रमांक ७ येथील रस्ता तातडीने दर्जेदार पद्धतीने डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नागरिकांचा सवाल

“पहिल्याच पावसात वाहून जाणारी विकासकामे करून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!