
हडपसर मध्ये पालिकेकडून निकृष्ट दर्जाचे काम….
हडपसर :
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हडपसर मध्ये रस्त्याची दुर्दशा आणि पाणी साठण्याच्या प्रकाराने महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन होत आहे येथील रस्ते वापरण्यायोग्य करावेत अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
कधी हलक्या स्वरूपाचा तर कधी जोरदार अशा सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे. काही ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडून तर काही ठिकाणी पाणी साठवून राहण्याची समस्या पावसाच्या सुरुवातीला सुरू झाली आहे. ससाणे नगर रस्त्यावर सांडपाणी वाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. ते पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. आता पाऊस सुरू झाल्याने ते काम अर्धवट राहिले आहे. पाणी टाकण्यासाठी येथील रस्ता उकारण्यात आला होता. रस्त्यावर राडाराडा तसेच पडला होता.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
ससाणे नगर हडपसर रस्त्यावरील दोन्ही कालवे, श्रीराम चौक, ससाणे नगर मुख्य चौक, भुयारी मार्ग, शनी मंदिर तूकाई दर्शन, सासवड रस्ता, सय्यद नगर रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. साठलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग शोधावा लागत आहे. पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या चिखलाने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताची भीती वाढली आहे.
पुणे मनपा प्रशासनाचा एक आती कारभार सुरू आहे. कामाचे योग्य परीक्षण करण्यास अधिकारी फिरकत नसल्याने अगदी निकृष्ट दर्जाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या भागात पावसाच्या पाण्याची योग्य नियोजन करून नागरिकांचा जीव सुरक्षित करावा अशी मागणी हडपसर ससाणे नगर नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सुजित माने म्हणाले की आम्ही ऑनलाईन तक्रार करूनही वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाने तक्रारीचे निरूपण न करता परस्पर तक्रार बंद केली. पावसाळा सुरू झाला चेंबरची दुरुस्ती न केल्यामुळे त्या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. ऑनलाइन तक्रार केल्यानंतर तिने सोडवता तक्रार कशी बंद करू शकतात असा सवाल सुचित माने यांनी केला आहे.
खंडेराव जगताप म्हणतात की सय्यद नगर गल्ली क्रमांक एक ते 22 यामध्ये कोठेही पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुणे मनपाकडून पावसाळी गटार लाईनीचे काम केलेले नाही. तसेच सांडपाणी वाहून नेणारी जे वाहिन्या आहेत त्यांचे साफसफाई देखील केलेली नाही.
त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे सर्व गल्ल्यात गुडघा एवढे पाणी साठत आहे. लेखी तक्रार करून सुद्धा ड्रेनेज विभागाचे अधिकारी मुकादम आणि अभियंते यांना या भागातील ड्रेनेजच्या साफसफाईकडे लक्ष देता आलेले नाही. पावसाळा सुरू झाला आहे यामध्ये काही दुर्घटना झाल्यास वित्तहानी किंवा मनुष्यहानी झाल्यास वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय यांनी याची जबाबदारी घ्यावी.