
‘या’ जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान
राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: फळबागांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यात कुठं कुठं शेती पिकांचं नुकसान झालं आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं फळबागांना फटका
नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ बागांना फटका बसला आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबुज पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर टरबूज जमीनदोस्त झालं आहे. पिकासाठी झालेला दीड ते 2 लाखांचा खर्च गेला वाया गेला आहे. नुकसान झाल्याने 5 लाखांचे कर्ज फेडू कसा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
धाराशिवमध्ये वादळी वारा अन् अवकाळीमुळं शेती पिकांचं नुकसान
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अचानक येत असलेला पाऊण आणि वादळी वाऱ्यामुळे केळी ची पाने फाटत असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.
बीड जिल्ह्यात अवकाळीने 18 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान; वीज कोसळून आठवडाभरात तिघांचा मृत्यू
बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने 5 ते 13 मे या कालावधीत 18 हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान झाले. तर तिघांचा वीज पडून मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याची नोंद महसूल विभागाकडून करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 24 गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत. यात तीन व्यक्ती मयत तर एक जखमी आहे. दुधाळ जनावरांसह इतर 16 जनावरांचा मृत्यू झाला. पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण पाच आहे. 18 हेक्टर वरील शेती पिकांचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून सुरू आहेत. बीड तालुक्यातील पिंपळनेर गेवराईतील सिरसदेवी इतर ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. पंचनाम्या नंतर नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
पिंपरी चिंचवड पावसाची दमदार हजेरी
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी पुढील 24 तासात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यातच आज दुपारी दोन वाजता दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगली तारंबळ उडाली आहे.